Powered By Blogger

Sunday, April 24, 2011

मेंदीच्या पानावर - २

"भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर.."
इअरफोन्स कानात कोंबून गाणं ऐकता ऐकता माझा डोळा कधी लागला काही कळालेच नाही. अचानक ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबला आणि मी दचकून जागी झाले. किलकिले डोळे करत बाहेर पहिल्यावर लक्षात आलं की बस ने भुसारी कॉलनीचा स्टॉप केव्हाच सोडला होता. मी झोपेत थेट पौड फाट्यापर्यंत पोचले होते.

"अरे देवा..." म्हणत मी ताड्कन उठले, कशीबशी बॅग पाठीवर अडकवून, विस्कटलेले केस ठीक ठाक करत मी खाली उतरले.

आता परत आमच्या फ्लॅटवर कसं जायचं? बाहेर पावसाचं चिन्ह होतं, रिक्षावाल्याने चांगलंच कापलं असतं.मग काय, वाट पाहीन पण पीएमटीनेच जाईन म्हणत नाईलाजाने बसची वाट पाहत थांबण्याशिवाय काही पर्याय नव्हता. ह्यादरम्यान मी स्वतःला हजार शिव्या देवून घेतल्या होत्या. पण आज नशीब जोरावर दिसत होतं, संध्याकाळी आठ वाजता चक्क बर्‍यापैकी मोकळी बस मिळाली, पीएमटीचा सौजन्य सप्ताह सुरू असल्याच्या थाटात कंडक्टरने जराही कटकट न करता सुटे पैसे परत केले आणि व्यवस्थित स्टॉपवरच बस थांबवली. मी खुशीतच खाली उतरले. एव्हाना वीजा चमकायला लागल्या होत्या. मी झपाझप पावलं टाकत निघाले, आमची बिल्डिंग रोड पासून थोडी आत होती, आणि आत जाणार्‍या रस्त्यावर कधीकधी अंधार असायचा, मला तेव्हा खूप भीती वाटायची. पाऊस सुरू व्हायच्या आत मी घरी पोचले आणि सुटकेचा नि:श्वास टाकत घरी शिरले. ऋता नेहमीप्रमाणे मोबाईलवरच चिकटलेली होती. तिचं दबक्या आवाजतलं बोलणं ऐकून, मी हळूच तिला डोळा मारला, तिने लगेच जीभ बाहेर काढून दाखविली.

तासाभराने माझं आवरल्यावर, ऋताने जेवायला हाक मारली. आज मावशींनी मस्त भेंडीची भाजी केली होती. आज ऋताचं मात्र जेवणात लक्ष दिसत नव्हतं, नेहमी हिच्या तोंडावर टेप चिकटवावा की काय असं वाटावं अशी अखंड बोलणारी ऋता आज काहीच बोलत नव्हती. मी काही बोलल्यावर सुध्दा अगदी तुटक तुटक उत्तरं देत होती.नक्कीच काहीतरी बिनसलं होतं. मला तिची थोडी काळजीच वाटू लागली होती. ऋता तीन वर्षांपासून माझी रूम पार्टनर होती, तसं तिच्या आणि माझ्यात कॉमन असं काही नव्हतं, तिचा स्वभाव माझ्या अगदी विरूध्द, सतत हसणारी, चेष्टा मस्करी करणारी, कायम मित्र मैत्रिणी, गेट टु गेदर्स, पिकनिक, पार्टीज एन्जॉय करणारी ऋता माझी पक्की मैत्रीण कधी झाली हे समजले सुध्दा नाही. आणि म्हणूनच तिचं गप्प राहणं खटकत होतं, कारण मागच्या वेळी, तिच्या अप्राईजल रिझल्ट नंतर एक दोन दिवस ती अशीच गप्प गप्प होती, पण सध्या तर अप्राईजल सिझन पण नव्ह्ता.
हात धुतल्यावर दोघी हॉलमध्ये बेडवर बसलो. मी लगेच विषय काढला.
"काय ऋताबाई, आज काय झालंय? गोर्‍या गोबर्‍या गालांवर एकही खळी पडली नाही संध्याकाळ पासून"
"काही नाही गं, थोडं डोकं दुखत होतं" उसनं अवसान आणत ऋता बोलली.
"ए ऋते, गप्प बस. खरं सांग, काय मला सांगण्यासारखं नाही का?"
"अगं हा स्वप्नील गं.." बोलता बोलता ऋताचा आवाज अचानक रडवेला झाला.
काहीतरी सिरिअस प्रकार वाटत होता. तसे दोघांचे अधूनमधून रुसवे फुगवे चालायचे, पण ऋताला अशी रडकुंडीला आलेली मी कधी पहिली नव्हती.
"काय झालं, काय म्हणतायेत आमचे भावी भाऊजी, काय खूप उतावळे झालेत की काय?"
मी थोडं वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी विचारलं?
"अगं काय सांगू? तुला माहितीये ना ह्या वीक मध्ये फुल्ल लोड होता प्रोजेक्ट मध्ये. काल तर गो लाईव्ह होता. रात्री खूप उशीर झाला निघायला. मला माझ्या टीएल नेच घरी सोडलं. बस्स, म्हणूनच ह्याचा पारा चढला. तू त्याच्याबरोबर येवढ्या रात्री आलीसच कशी? असं म्हणत माझ्याशी भांडतोय तो, म्हणतोय की मी काय मेलो होतो का? आता मला सांग, हा काय हडपसर वरून येणार होता का हिंजवडीला मला न्यायला?"
मला पहिल्यांदा ऐकून धक्काच बसला. स्वप्नील सारखा चांगला मुलगा असं काही वागेल यावर माझा विश्वासच बसेना.
"अगं तसं नसेल गं, काहीतरी गैरसमज झाला असेल." मी तिला समजावण्याच्या उद्देशाने म्हणाले.
"नाऽऽहीऽऽ. असं काही पहिल्यांदा होत नहिये. गेले काही दिवस मी पाहतीये, स्वप्नील खूपच पझेसिव्ह होत चाललाय. माझं माझ्या मित्रांशी, कुठल्याही मुलाशी जास्त बोललेलं त्याला खपत नाही, ह्याचा फोन मी चुकून रिसिव्ह केला नाही तरी खुप खोदून खोदून प्रश्न विचारतो. मागच्याच वीकेंडची गोष्ट, आम्ही दोघे डेक्कन च्या मॅक्डी मध्ये बसलो होतो, तिथे माझा कॉलेजचा एक मित्र अथर्व भेटला, मला पाहून अगदी गर्दीतून वाट काढत काढत आमच्या टेबलापाशी आला. फक्त एखाद दुसरा मिनिट होता, फक्त हाय हेलो करून निघून सुध्दा गेला. मग काय, आमच्या साहेबांचा मूड लगेच ऑफ. पूर्ण वेळ फक्त अथर्वचीच माहिती काढून घेत होता, तू त्याला कशी काय ओळखतेस?, तुमची मैत्री अजून आहे का? वगैरे, वगैरे..आता हे गुण आहेत, लग्न झाल्यावर काय होणार आहे कुणास ठावुक?"
बोलता, बोलता ऋताचे गोरे गाल लालबुंद झाले होते. मला तर हे सगळं विचित्रच वाटत होतं. ऋताचं लग्न आईवडिलांनीच ठरवलं होतं. स्वप्नील मला तरी खूप साधा, सरळ, लाजरा-बुजरा मुलगा वाटायचा. तो ऋताला भेटायला यायचा तेव्हा खालूनच बोलून निघून जायचा, चुकून सुद्धा कधी वर यायचा नाही. मला जेव्हा जेव्हा तो भेटला, तेव्हा अगदी अहो, जाहो करून बोलत असायचा, शेवटी मीच ऋताकडून रागवून रागवून अरे तुरे वर बोलणं आणायचे. आणि जे काही ऋताने आज सांगितलं ते ऐकून मी सुन्नच झाले होते. तिला काही तरी समजवायचं म्हणून मी बोलून गेले.
"अगं स्वप्नील चांगला मुलगा आहे. तुमचं लग्न आता दोन महिन्यांवर आलं आहे. काही गैरसमज असतील तर आत्ताच बोलून मिटवून टाका. मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होईल"
"तसं झालं तर चांगलंच आहे." एक सुस्कारा टाकत ऋता पुटपुटली.
मी तिला समजावत होते खरी, पण कुठेतरी मलाच खुप उदास वाटू लागलं होतं. खरोखर, एकविसाव्या शतकात सुध्दा ही पुरूष मंडळी केवळ पुढारलेपणाचं ढोंग आणतात, आणि आतून मात्र तेवढीच बुरसटलेली आणि मागासलेली असतात, आणि असलं काही ऐकून मला तर ह्या असल्या मुलांचा आणि पुरुषी प्रवृत्तीचा जास्तच तिरस्कार वाटायला लागायचा, आपण पुरुष द्वेष्टे तर बनत चाललो नाही ना अशी उगाचच शंका यायची. मी तशाच मनःस्थितीत उठून बेडरूम मध्ये गेले.कानांत इअरप्लग्स कोंबून संदीप खरेची गाणी प्ले केली आणि डोळा कधी लागला कळालंच नाही..
(क्रमशः)

No comments: